जीवन कसे असावे, ते कसे जगावे, का जगावे आणि कशासाठी जगावं याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी होते. ते जनसामान्यांसाठी जीवन जगले.. ते देशासाठी, देशवासियांसाठी जगले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक होते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत केले. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, दहा वर्षांपासून अटलजी कोणत्याही राजकीय मंचावर आले नव्हते. तरीही लोक त्यांना विसरले नाहीत, त्यांच्या अंत्ययात्रेला लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. एवढेच नाही तर देश शोकसागरात बुडाला. अटलजींची जादू होती ती हीच. येणाऱ्या पिढ्याही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.

दीर्घ काळ विरोधात राहूनही त्यांनी विचारधारेला तडा जाऊ दिला नाही. संसदीय परंपरेचा गौरवगान करताना ते जनसामान्यांचा आवाज म्हणून जगले. जेव्हा संधी मिळाली तेव्हा सर्वसामान्यांसाठी त्याचा उपयोग केला. ते नावानेच अटल नव्हते तर त्यांच्या वर्तणुकीत, त्यांच्या कणाकणात अटलभाव दिसून येतो.

पोखरणमधील अणुचाचणी संपूर्ण जगाला धक्का देणारी होती. दशकांपासून त्याची तयारी सुरू होती. पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. ११ मे ला पहिली अणूचाचणी झाल्यानंतर जगभरातून दबाव निर्माण झाला. त्याला न जुमानता त्यांनी पुन्हा १३ मे रोजी दुसरी अणुचाचणी करत जगाला उत्तर दिले. यातून त्यांचा निग्रह दिसून येतो.

बजरंग पुनियाने कधी अटलजींना पाहिलं नसेल. पण त्याने आपले सुवर्ण पदक अटलजींना समर्पित केले. या कृतीतूनच अटलजींच्या व्यक्तिमत्वाची महती आपल्याला समजेल, असेही मोदी म्हणाले.