दिवसेंदिवस जभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे भारतातही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, करोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव आता चिंतेचा विषय ठरत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत करोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्येच भारत करोनाबाधितांच्या सर्वाधिक रुग्णसंख्येमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला. तर शुक्रवारीही भारतात करोनाचे ६० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आणि तब्बल ९२६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ दिवसांमध्ये देशात ३ लाख २८ हजार ९०३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर अमेरिकेत सहा दिवसांमध्ये ३ लाख २६ हजार १११ रुग्णांची नोंद झाली. कर ब्राझीलमध्ये २ लाख ५१ हजार २६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. २ ऑगस्ट, ३ ऑगस्ट, ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी जगातील सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली. तर गुरूवारीच देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला.

करोनामुळे सुरूवातीच्या सहा दिवसांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलमध्ये ६ हजार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे भारतात ५ हजार ०७५ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे शुक्रवारी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. बिहार, तेलंगण, ओदिशा, पंजाब आणि मणिपुरमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येंची नोंद झाली.

कशी आहे मुंबईतील स्थिती?

शुक्रवारी महाराष्ट्रात १० हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ३०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख ९० हजार २६२ वर पोहोचली. याव्यतिरिक्त राज्यात आतापर्यंत १७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. मुंबईतदेखील शुक्रवारी १ हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील स्थिती सुधारत असल्याचं दिसून येत आहे.

आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर

आंध्र प्रदेशातही शुक्रवारी १० हजारांपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. २ लाख रुग्णसंख्या पार करणारं आंध्र प्रदेश हे तिसरं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेशात करोनाबाधितांची एकूण संख्या आता २ लाख ६ हजार ९६० वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशपेक्षा रुग्णसंख्या अधिक आहे. १२ मार्च रोजी या ठिकाणी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर जवळपास १३५ दिवसांमध्ये ही संख्या १ लाखांच्या पुढे गेली होती.