SC Sets October 18 Target to Conclude Arguments in Ayodhya Case: अयोध्या राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना थांबवण्यात येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सुनावणी सुरु असताना त्याचवेळी मध्यस्थता करण्याचे प्रयत्न सुरु ठेवण्यास काही हरकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सागितलं आहे. यासोबतच सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी डेडलाइन दिली आहे. रंजन गोगोई यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितलं आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गरज लागल्यास एक तास अतिरिक्त तसंच शनिवारीही सुनावणी करण्याची तयारी दर्शवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितलं असल्या कारणाने, देशातील अत्यंत संवेदनशील विषय मानल्या जाणाऱ्या अयोध्या प्रकरणातील निकाल नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी निर्णय येण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी रोज एक तास अतिरिक्त देण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच गरज असेल तर शनिवारीही सुनावणी करु शकतो असं सुचवलं आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे की, “१८ ऑक्टोबरपर्यंत पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला पाहिजे जेणेकरुन निर्णय घेतला जाऊ शकतो”. “आम्हाला मध्यस्थी करण्यासाठी पत्रं मिळाली आहेत. हे प्रयत्न सुनावणी सुरु असतानाही करण्यात आमची काही हरकत नाही,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्वाणी आखाडाने पत्र लिहून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. यावरच बोलताना सर्वोच्च न्यायालयाने असे प्रयत्न करण्यासाठी तुमचे हात मोकळे आहेत, पण सुनावणी सुरु राहिल असं स्पष्ट केलं आहे.