करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जशी वाढतेय तसंच या आजारावर परिणामकारक ठरणारं औषध शोधून काढण्यासाठी नवनवीन संशोधन कार्यक्रम सुरु होत आहेत. जगभरात करोनावर नवीन औषध आणि लस संशोधनाच्या रोज वेगवेगळया चाचण्या सुरु आहेत. बहुतांश लसी या क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या फेजमध्ये आहेत.

जुलैमध्ये तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरु होतील आणि ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत करोनावर बनवण्यात आलेली लस यशस्वी ठरली की, नाही ते स्पष्ट होईल. दरम्यान सध्या तरी आधीपासून वापरात असलेल्या औषधांनी या आजारावर उपचार करण्यात येत आहेत.

अलीक़़डेच एक मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत पतंजलीचे संस्थापक बाबा रामेदव यांनी करोना व्हायरसवर आपल्याकडे उपचार उपलब्ध असल्याचा दावा केला होता. माझी औषधे १०० टक्के परिमाणकार ठरतील असेही त्यांनी म्हटले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

गिलोय आणि अश्वगंधा करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये परिणामकारक असल्याचे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे. करोना व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर तो संपूर्ण शरीराची रचना बिघडवून टाकतो. या व्हायरसचा गुणाकार होत जातो व जास्तीत जास्त पेशींवर परिणाम होतो. इन्फेक्शनची साखळी मोडण्यामध्ये गिलोय १०० टक्के परिणामकारक आहे असे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे.

पतंजलीने बनवलेल्या औषधाच्या चाचण्या सुरु आहेत. लवकरच त्याचे रिझल्ट समोर येतील. पतंजलीचे संशोधन पूर्ण झाले आहे आणि लवकरच या संशोधनाचा निष्कर्ष जगासमोर मांडला जाईल. पतंजलीकडून करोना व्हायरसवर वनौषधीपासून लस बनवण्यात येत आहे. आयुर्वेदामध्ये माणसांसाठी धोकादायक ठरणाऱ्या करोना व्हायरसवर उपचार करण्याची ताकत आहे. मूळपासून हा आजार बरा करता येऊ शकतो असे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे.