सध्या जगभरात तसच देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचं महत्त्वाचं काम करत आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोविड १९ च्या उपचारासाठी औषधाची वैद्यकीय चाचणी सुरू केल्याची माहिती दिली आहे. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पतंजलीनं औषधाची चाचणी सुरू केल्याचं सांगण्यात आलं आहे.

“आम्ही केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबद्दल बोलत नाही. आम्ही करोनाच्या उपचाराबद्दल सांगत आहोत. गेल्या आठवड्यात नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर कंपनीनं इंदूर आणि जयपूरमध्ये करोनाच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत,” अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. मनी कंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. करोनाच्या चाचण्यांदरम्यान सध्या केवळ मोठ्या कंपन्यांची नावं समोर येत होती. यामध्ये गिलियड सायंसेज, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, इनोव्हियो फार्मा आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या कपंन्या पुढे असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु आता यात पतंजलीचंदेखील नाव जोडलं गेलं आहे. या यादीत पतंजलीचं नाव जोडलं जाणं ही कंपनीसाठी मोठी बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

“फेब्रुवारी महिन्यापासूनच पंतजली समुहानं कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार सुरू केले होते. मार्च महिन्यापर्यंत पतंजलीनं अनेकांवर उपचार केले. परंतु ते वैद्यकीय चाचणीचा भाग नव्हते. आमच्या संशोधनाला उपचाराच्या रुपात आणण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी होणं आवश्यक आहे. याकडेच पाहता नियामक मंडळाची मान्यता घेतल्यानंतर याची वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली,” असं बालकृष्ण म्हणाले.

वैद्यकीय चाचणीची परवानगी मिळवणं सोप नव्हतं. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनंदेखील हे पुढे नेण्यास रस दाखवला नाही. म्हणून पतंजली समुहानं क्लिनिकल ट्रायल्स रेग्युलेटर ऑफ इंडियाकडे नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आणि जयपूर विद्यापीठाअंतर्गत एका विभागात वैद्यकीय चाचण्यांना सुरूवात केल्याचं बालकृष्ण यांनी सांगितलं. “कोणत्याही आयुर्वेदीक कंपनी किंवा संस्थेत असलेल्या सुविधांशी आमची तुलना करा. आमच्या प्रयोगशाळा या उत्तम आहेत. आमच्याकडे सध्या ५०० संशोधक आहेत आणि त्यापैकी कमीतकमी १०० हे पोस्ट डॉक्टरेट संशोधक आहेत,” अशी माहितीही त्यांनी दिली.

२०१९ मध्ये योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचं टर्नओव्हर ८ हजार ५०० कोटी रूपये इतकं होतं. तसंच या कंपनीत ५० हजार कर्मचारी काम करत होते. ब्रोकरेज हाऊस सीएलएसए आणि एचएसबीसीनुसार पतंजली ही भारतातील तेजीनं वाढणारी एफएमजीसी आहे. करोनाच्या उपचारात वैद्यकीय चाचण्या सुरू करणं हे कंपनीनं टाकलेलं मोठं पाऊल असल्याचंही म्हटलं जात आहे.