ढाक्याजवळ तयार कपडय़ांच्या कारखान्यास लागलेल्या आगीत १२४ जण मृत्युमुखी पडले आहेत. देशातील भीषण अशा आग दुर्घटनांपैकी ही एक आहे. ढाक्यापासून ३० कि.मी अंतरावर असलेल्या अशुलिया सवार या उपनगरात काल रात्री ताझरिन फॅशन फॅक्टरीला आग लागली व ती तळमजला, पहिला मजला अशी पसरत गेली. ही इमारत सहा मजली आहे.
अधिकारी व प्रत्यक्ष घटनादर्शीनी सांगितले की, आम्हाला आतापर्यंत १२४ मृतदेह सापडले आहेत. अजून मदतकार्य चालू आहे असे मेजर महबूब हुसेन या अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.
अनेक मृतदेह खूपच जळालेल्या अवस्थेत सापडले, असे त्यांनी स्पष्ट केले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असे सूचित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात भीषण आग असून ती विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूरचित्रवाणीवरील चित्रणात लष्करी जवान व अग्निशमन जवान हे मृतदेह बाहेर काढताना दिसत होते, अनेकांचे नातेवाईक हे बाहेर थांबून वाट पाहात होते. सवार कँटोन्मेंटचे अधिकारी मेजर जनरल सईद हसन सुऱ्हावर्दी हे मदतकार्याची देखरेख करीत आहेत. अनेक मृतदेह शेजारच्या प्राथमिक शाळेत ठेवण्यात आले आहेत. अनेक कामगारांनी कारखान्याच्या वरच्या मजल्यावरून उडय़ा मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण समजू शकले नाही परंतु अशा आगी या शॉर्ट सर्किटमुळे लागतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे.
 संतप्त नातेवाईक व सहकारी कामगार हे आग विझवण्यातील दिरंगाईच्या विरोधात निदर्शने करीत असल्याने तणाव निर्माण झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जादा पोलिस तुकडय़ांना पाचारण केले आहे.