आयपीएल २०२१मधील उर्वरित सामने, यंदाचा टी-२० वर्ल्डकप आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय उदया २९ मेला विशेष बैठक (एसजीएम) घेणार आहे. या बैठकीसाठी बीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आज रात्री मुंबईत दाखल होईल. भारत करोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सर्व क्रीडा उपक्रम नियंत्रणात आणले गेले आहेत.

यंदा भारतात टी-२० क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे आणि बीसीसीआय या स्पर्धेची तयारी करत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत या स्पर्धेचे आयोजन करेल. करोनाच्या कठीण परिस्थितीत या स्पर्धेच्या कार्यक्रमाची विशेष रूपरेषा तयार करण्यासाठी बीसीसीआयने २९ मे रोजी एक बैठक बोलावली आहे.

हेही वाचा – इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय महिला क्रिकेटपटूंनी घेतली लस

 

वर्ल्डकपसोबतच या बैठकीत देशांतर्गत क्रिकेट हंगामावर (२०२१-२२) चर्चा होणार आहे. “देशातील करोनाचा प्रसार लक्षात घेऊन आगामी स्थानिक क्रिकेट हंगामाची चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा २९मे रोजी होईल”, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

मागील हंगामात रणजी स्पर्धा खेळवण्यात न आल्याने बीसीसीआय यावर्षी सप्टेंबरपासून घरगुती हंगाम सुरू करण्याचा विचार करीत आहे. २०२०-२१च्या मोसमात विजय हजारे एकदिवसीय आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० करंडक या मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. नव्या हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेने होऊ शकते.

हेही वाचा – कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं, सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक