ऐतिहासिक निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायलयाने समलैंगिकता कायद्याने गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे मागील १५८ वर्षांपासून अंमलात असलेल्या कलम ३७७ मधील वादग्रस्त समलैंगिक संबंधांविरोध करणाऱ्या तरतुदी कालबाह्य होणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली हायकोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला. ३७७ हे कलम काढून टाकण्याचे अधिकार संसदेचे असल्याचे सांगितले. २०१६ साली सर्वोच्च न्यायलयामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच जणांनी याचिका दाखल केली. सरन्यायधिश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने अखेर दोन वर्षांनी ही याचिका निकाली काढली. निकाल वाचन करताना दीपक मिश्रा यांनी, एकमेकांच्या हक्कांचा आदर करणे म्हणजेच माणुसकी. म्हणूनच समलैंगिक शरीर संबंधांना गुन्हा ठरवणे अयोग्य ठरेल असे मत नोंदवले. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरामधून स्वागत होत आहे. मात्र २०१६ साली न्यायालयाला त्यांच्याच निर्णयावर पुनर्विचार करण्यास भाग पडाणारे हे पाच याचिकाकर्ते आहेत तरी कोण हे जाणून घेऊयात.

नवजीत सिंग जोहर (५९)

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते लोकप्रिय क्लासिकल डान्सर नवजीत आणि त्यांच्या पार्टनरने कलम ३७७ विरोधात याचिका दाखल केली. ३७७ कलम हे आमच्या जगण्याच्या मूलभूत अधिकाराच्याविरोधात असून संविधानाने दिलेला जगण्याचा अधिकार हिरावून घेत असल्याचे या याचिकेत नवजीत यांनी म्हटले होते. जोहर हे हरियाणामधील अशोका विद्यापिठामध्ये गेस्ट लेक्चररही आहेत.

सुनील मेहरा (६३)

मेहरा हे पेशाने पत्रकार आहेत. मॅक्झीम या पुरुषांसाठीच्या मासिकाच्या भारतीय अवृत्तीचे ते माजी संपादक आहेत. ते एक अभिनेतेही आहेत. तसेच १३ व्या शतकातील दस्तांगोई या विशेष पद्धतीने गोष्टी सांगण्याच्या कलेचे जाणकार आहेत. दूरदर्शनवरील सेंट्रलस्टेज या कार्यक्रमाची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन सुनील मेहरा यांनीच केले होते. नवजीत यांच्या सोबतीने त्यांनी अभ्यास नावाच्या स्टुडीओची स्थापना केली आहे.

रितू दालमिया (४५)

रितू या सेलिब्रिटी शेफ आहेत. डिव्हा या हॉटेल समुहाचे मालक आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहीली आहेत. तसेच त्यांनी अनेक ट्रॅव्हॉग्सबरोबरच कूकबुक्सही लिहीली आहेत. लिखाणाशिवाय त्यांनी अनेक टिव्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालनाही केले आहे. कोलकत्त्यामधील एका मारवाडी कुटुंबात जन्म झालेल्या रितू यांनी आपल्या फॅमेली बिझनेसमध्ये उडी घेतली. त्या इटालियन कुझिन स्पेशलिस्ट आहेत. त्यांचे ट्रॅव्हलींग डिव्हा: रेसिपीज फ्रॉम अराऊण्ड द वर्ल्ड इन २०१२ हे पुस्तक खूपच गाजले.

अमन नाथ (६१)

हे एक हॉटेल व्यवसायिक आहेत. निमराना या हॉटेल उद्योगाचे ते मालक आहेत. त्यांना इतिहास आणि स्थापत्यकलेची विशेष आवड असल्यानेच त्यांनी या विषयांवर अनेक पुस्तके लिहीली आहेत. अमन हे एक लेखक असण्याबरोबरच चांगले कवीही आहेत. कला, इतिहास, स्थापत्यकला, फोटोग्राफी या विषयांवरील १३ पुस्तकांचे ते सह लेखक आहेत. त्यांचे पुस्तक क्रिस्टीजने जगभरामध्ये प्रकाशित करण्यासाठी निवडले पहिले भारतीय पुस्तक ठरले.

आयशा कपूर (४४)

उद्योजिका असणाऱ्या आयशा या खाद्य आणि पेय उद्योगाशी संबंधित आहेत.