सध्या महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुकात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. परंतु अशाचवेळी नेटकऱ्यांकडून त्यांना विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. मात्र मोदींच्या या पहिल्याच सभेला अनेकांनी विरोध केल्याचं इंटरनेटवर पहायला मिळालं होतं. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटवर इंडियावर टॉप ट्रेण्डींग होता. त्यानंतर आता नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत #BechendraModi हा हॅशटॅग सुरू केला आहे.

बुधवारपासूनच ट्विटर इंडियावर #BechendraModi हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या परिस्थितीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील सर्वात मोठी, सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात बीपीसीएलचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. या कंपनीतील निम्म्याहून अधिक, ५३ टक्के हिस्सा विक्रीची तयारी केंद्र सरकार करत असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात उत्सुक खरेदीदारांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. देशातील खासगी इंधन व्यवसाय क्षेत्रात वरचष्मा असलेली मुकेश अंबानी यांचा प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज समूह या प्रक्रियेत रस घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच एमटीएनएल, बीएसएनएल सारख्या कंपन्यांच्या परिस्थितीवरूनही सर्वांनी निशाणा साधला आहे.

यापूर्वी अर्थसंकटाच्या फेऱ्यातील सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्या बंद करून मोडीत काढण्याचा अथवा त्यांच्या विलीनीकरणाचा पर्याय सरकारपुढे उरला असल्याचं केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एसटीसी), एमएमटीसी, प्रोजेक्ट अ‍ॅण्ड इक्विपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (पीईसी) या तीन कंपन्यांबाबत वाणिज्यमंत्र्यांनी संकेत दिले होते. त्यातच अनेक कंपन्यांची स्थिती सध्या चांगली नसून त्यावरू नेटकऱ्यांनी मोदींवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. #BechendraModi हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत असून अनेकांनी या माध्यमातून मोदींवर टीका केली आहे. सरकार रोजगार, रस्ते यावर काही बोलत नसून यावर प्रश्न विचारला तर सरकार दुसऱ्या विषयांकडे लक्ष नेतं असा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी बीएसएनएल, एमटीएनएल आणि रेल्वेच्या खासगीकरणाचा सरकारचा डाव असल्याचं म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.