लोकसभा निवडणूकीच्या सातव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी देखील, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळल्याचे दिसत आहे. बंगालच्या भाटपाडा मतदारसंघात आज (रविवार) मतदानप्रक्रिया सुरू होण्याअगोदरच हिंसा भडकली. या ठिकाणी काही गाड्यांना आग लावण्यात आली. एवढेच नाहीतर गोळीबार व बॅाम्ब फेकण्यात आल्याची देखील घटना घडली.

भाजपा सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी बंगाल पोलीसांसह तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आहे . तर टीएमसीने यासाठी बैरकपूरचे भाजपाचे उमेदवार अर्जुन सिंह व भाजपालाच जबाबदार ठरवले आहे. बारासात लोकसभा मतदार संघातील कदम्पुकुर भागात देखील हिंसाचाराची घटना घडली आहे. टीएमसीचे उमेदवार सुभाष बोस यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, भाजपा नेते अनुपम दत्ता यांना देखील नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानापासून ते शेवटच्या टप्प्यातील मतदानापर्यंत टीएमसी व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कायम मोठा वाद झाल्याचे पहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये ९ जागांसाठी आज मतदान होत आहे. ज्यामध्ये कोलकाता उत्तर, कोलकाता दक्षिण, दमदम, बारासात, बशीरहाट, जादवपुर, डायमंड हार्बर, जयनगर (एससी) आणि मथुरापूर (एससी) लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हिंसाचाराच्या घटना पाहता कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.