आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकारपरिषद घेऊन याबाबत घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशाची विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकारपरिषेदत निडवणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानुसार २७ मार्च ते २९ एप्रिल पर्यंत मतदान होणार असून,सर्व राज्यांमधील निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे.

या पाच राज्यांपैकी सर्वाधिक चर्चा असलेली व अवघ्या देशाचे लक्ष लागलेली पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तब्बल आठ टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिला टप्प्यातील मतदान – २७ मार्च, दुसरा टप्पा – १ एप्रिल, तिसरा टप्पा- ६ एप्रिल, चौथा टप्पा – १० एप्रिल, पाचवा टप्पा १७ एप्रिल, सहावा टप्पा – २२ एप्रिल, सातवा टप्पा – २६ एप्रिल व आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक भाजपा व तृणमूल काँग्रेसकडून प्रतिष्ठेची करण्यात आल्याचे दिसत आहे. कारण, आतापर्यंत राज्यातील सभा व अन्य कार्यक्रमांमधून या दोन्ही पक्षांमधील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे. शिवाय, अनेकदा नेत्यांवर हल्ल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे.

देशभरात एकीकडे करोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे या विधानसभा निवडणुका होत आहेत. आसामध्ये भाजपाचे सरकार आहे. तर, पुद्दुचेरीत मागील आठवड्यातच काँग्रेसचे सरकार कोसळल्याने तिथं राष्ट्रपती शासन लागू करण्यात आलेलं आहे.

Assembly Elections: पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला निकाल

पाच राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे. पाच राज्यात २.७ लाख मतदान केंद्रावर मतदान होत असून, १८.६ कोटी मतदार आहेत. या सर्व राज्यांध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.