केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवत तृणमूलला मत न दिल्याने हत्या केल्या जात असल्याचा आरोप केला आहे.लोकांना त्रास दिला जात आहे. महिलांवर बलात्कार होत आहेत, पण मुख्यमंत्री गप्प आहेत. मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहाणार आहेत असा सवाल स्मृती इराणी यांनी केला आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने मतदानानंतरच्या हिंसाचाराच्या प्रकरणात राज्य सरकारची आढावा याचिका फेटाळून लावत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे बर्‍याच तक्रारी आल्या आहेत. परंतु राज्याचे म्हणणे आहे की कोणतीही तक्रार आलेली नाही असे कोर्टाने म्हटले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे कौतुक

स्मृती इराणी यांनी हायकोर्टाच्या निर्णयाचे कौतुक करताना सांगितले की, “मी न्यायालयाचे आभार व्यक्त करते कारण छळ, खून आणि बलात्कार झालेल्या महिलांना आत्मविश्वास मिळेल, त्यांना न्याय मिळेल.” मी लोकशाहीमध्ये प्रथमच पाहत आहे की मुख्यमंत्री लोकांचा मृत्यू होताना पाहत आहेत कारण त्यांनी त्यांना मत दिले नाही,” असे स्मृती इराणी यांनी सांगितले.

निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार

“आपल्या देशात पहिल्यांदा निवडणुकीच्या निकालानंतर हजारो लोक आपली घरे, गाव सोडून राज्याच्या सीमा ओलांडत आहेत. ममता बॅनर्जी आणि तृणमूलची माफी मागत आहेत. धर्म परिवर्तीनासाठी तयार असल्याचे म्हणत आहेत. महिलांना घराबाहेर काढून उघडपणे बलात्कार केला जातो. ६० वर्षीय महिलेने सुप्रीम कोर्टात असे सांगितले की, केवळ ६ वर्षांच्या नातवासमोर तिच्यावर बलात्कार केला, कारण ती भाजपाची कार्यकर्ता होती. मुख्यमंत्री गप्प राहून आणखी किती बलात्कार पाहतील? ” असे स्मृती इराणी म्हणाल्या.

राज्यपालांचीही ममतांवर टीका

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ आज उत्तर बंगालच्या दौर्‍यावर गेले होते. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर निशाणा साधला. राज्यघटना, राज्यपाल आणि केंद्र सरकार यांच्याबाबत इतका राग का आहे? असा सवाल धनखड़ यांनी राज्य सरकारला केला. लोक भीतीमुळे काही बोलत नाही. मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री त्यांच्याकडे गेला नाही. नुकसान भरपाई दिली गेली नाही. कोणाला अटक का केली नाही? स्वातंत्र्यानंतर कोठेही असा हिंसाचार झालेला नाही, असे धनखड़ म्हणाले.