लॉकडाउनच्या काळाने अनेकांना काही ना काहीतरी शिकवलंच आहे. या लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत बेंगळुरूमधल्या सात सॉफ्टवेअर इंजिनीअर्सनी गच्चीवर फळभाज्या पिकवल्या आहेत. हेन्नूरमध्ये कनकश्री येथे राहणारे हे सात जण इतरांसाठी प्रेरणादायी
ठरत आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अचानक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणारे रवी कुमार रेड्डी यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना सुचली. “शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला शेतीविषयक काही गोष्टी माहित होत्या आणि आता काम करता करता आणखी काही गोष्टी समजल्या”, असं रेड्डी यांनी सांगितलं. रेड्डी त्यांच्या इमारतीच्या टेरेसवर १५ विविध प्रकारच्या भाज्या पिकवतात. भेंडी, बीट, टोमॅटो, मिरची, कांदे यांची लागवड त्यांनी केली आहे. रेड्डी यांचं काम पाहून त्याच परिसरातील सहा इंजिनीअर्सनी त्यांना साथ दिली.

विशेष म्हणजे या झाडांना ८० टक्के पुनर्वापर केलेलं पाणी दिलं जातं. यासाठी साबण आणि डिटर्जंट यांचा वापर त्यांनी थांबवला आहे. घरकामात वापरलं गेलेलं पाणी नंतर झाडांना दिलं जातं. पावसाच्या पाण्याचाही पुनर्वापर करत असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं.

नोकरी करताना कधीच असं काही करण्याची कल्पना डोक्यात आली नसती. लॉकडाउनमुळे वेळ मिळाला आणि हे सगळं करण्याचा वेगळाच आनंद मिळाल्याचं ते सांगतात. गच्चीवर पिकणाऱ्या भाज्या या सात जणांच्या कुटुंबीयांसाठी पुरेसे असतात. त्यात कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरण्यात आले नाही. त्यामुळे या ताज्या भाज्यांची चवसुद्धा बाजारातून विकत आणलेल्या भाज्यांपेक्षा खूप वेगळी असते, असं ते म्हणतात.