केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताच निर्णय झाला नाही. अशात दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदमुळे वेळेत विमानतळावर न पोहोचू शकणाऱ्या प्रवाशांना विमान कंपनी एअर इंडियाने दिलासा दिला आहे.

डेट चेंज करण्याचा पर्याय –
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारत बंदमुळे जे प्रवासी वेळेत विमानतळावर पोहोचू शकणार नाहीत त्यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करण्याची परवानगी असेल. प्रवाशांकडून No-Show Charge देखील आकारला जाणार नाही. म्हणजे ज्या प्रवाशांकडे 8 डिसेंबर, 2020 च्या प्रवासाचं कन्फर्म तिकीट असेल ते भारतातील कोणत्याही एअरपोर्टवरुन एकदा फ्रीमध्ये त्यांच्या प्रवासाची तारीख ( डेट चेंज)बदलू शकतात.


याशिवाय, भारत बंदमुळे प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, हे टाळण्यासाठी प्रवाशांनी विमानतळावर पोहोचण्यासाठी वेळेआधी घराबाहेर पडावं असं आवाहनही एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना केलं आहे.

दरम्यान, या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून ‘भारत बंद’लाही समर्थन दर्शवलं आहे. तसेच, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. दुसरीकडे, 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे.