भीम आर्मी, बहुजन य़ूथ फॉर मिशन २०१९ यांसारख्या संघटना विरोधकांकडून पडद्यामागून चालवल्या जात आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते दलित वस्त्यांमध्ये जाऊन आमच्या भोळ्या-भाबड्या लोकांची दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या भावनांशी खेळत आहेत, असा खळबळजनक आरोप बहुजन समाज पक्ष्याच्या सर्वोसर्वा मायावती यांनी केला आहे.

मायवाती म्हणाल्या, या संघटना दलित वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही मायावती यांना पंतप्रधान बनवणार असल्याचे सांगत आहेत. माझे नाव सांगून ते लोकांकडून निधीही उकळत आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या लोकांना लोकांना उच्च जातीतील लोकांविरोधात भडकावत आहेत. त्यांच्या मनात द्वेष पसरवत आहेत. पक्षाच्या वाढीमध्ये या संघटना अडथळा ठरत आहेत. बसपा सर्व जातीधर्मांचा पक्ष आहे. या संघटना वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण झाल्या आहेत.

भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना मायावती म्हणाल्या, मोदी सरकारची पाच वर्षे आता पूर्ण होत आली आहेत. त्यांनी लोकांना दिलेल्या आश्वासनांपैकी ५० टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही असं ठामपणए वाटतयं की आता ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार हल्ला करताना मायावती म्हणाल्या, आपल्या कामाच्या अयशस्वीतेकडून लक्ष हटवण्यासाठी त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. जर त्यांच्या भावना चांगल्या असत्या तर त्यांना मंदिर बांधण्यासाठी पाच वर्षांसाठी वाट पहायला लागली नसती. ही त्यांची राजकीय रणनीती असून बाकी काहीही नाही. त्याच्या सहकारी संघटना शिवसेना आणि विश्व हिंदू परिषद जे काही करीत आहे ते एक षडयंत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.