भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद आज संसदेतही उमटल्याचे दिसले. लोकसभेत विरोधी पक्ष विशेषत: काँग्रेसने याप्रश्नी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. ज्या-ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे. तिथे दलितांवर अत्याचार होतो, असा आरोप काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. समाजात दुही माजवण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे लोक असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा यामागे हात आहे. पंतप्रधानांनी याप्रश्नी संसदेत बोलावे. ते या विषयावर गप्प राहू शकत नाहीत. अशा प्रसंगी ते ‘मौनीबाबा’ असतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यसभेतही उमटले. लोकसभेत मात्र काँग्रेसने भाजपाला धारेवर धरले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींची नेमणूक करण्याची मागणी खरगे यांनी केली. दरम्यान, खरगे यांच्या वक्तव्यावर संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस आग विझविण्याऐवजी आग भडकावण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही खरगे यांना फटकारले. याप्रश्नी राजकारण करण्यापेक्षा चर्चा व्हावी असे सांगत त्यांनी खरगे यांना संसदेत योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला. तुम्हाला दलितांचे भलेही नकोय आणि चर्चाही नकोय का, असा सवाल करत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. त्यामुळे यावर खरगे यांनी जास्त भाष्य न करण्याची त्यांनी विनंतीही केली.

तत्पूर्वी, खरगे यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींना धारेवर धरले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी आपली भूमिका मांडली. पण पंतप्रधानांनी आता यावर संसदेत निवेदन द्यावे. पण त्यांना अशा मुद्द्यांवर मौनच बाळगायचे असते. ते मौनीबाबा आहेत, अशी टीका त्यांनी केली. भाजपाशासित राज्यात दलितांवर सर्वाधिक अत्याचार होतो, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. हिंदुत्ववादी संघटना समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.