बहुप्रतिक्षित बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजणार आहे. निवडणूक आयोगानं १२.३०वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, यात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. सूत्रांच्या माहिती प्रमाणे मागील विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली होती. मात्र, यावेळी तीन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासूनच बिहारमधील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली. बिहारमध्ये करोना काळात निवडणूक होत असून, प्रचारापासून ते मतदानापर्यंत अनेक बाबींसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. करोनामुळे सुरूवातीला विधानसभा निवडणूक घेण्यास विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक ठरलेल्या वेळेतच होतील असं स्पष्ट केल्यानतंर यंत्रणा कामाला लागली होती.

करोनाच्या संक्रमणानंतर देशातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यानं केंद्रीय निवडणूक आयोगानं यासंदर्भात नियमावली जाहीर केलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवण्यात आलेली आहे. मतदान केद्रांवरील मतदारांची संख्या कमी करून मर्यादित करण्यात आली आहे.

मतदानाची प्रक्रिया होत असताना करोनाचा प्रसार न होण्यासाठीही काळजी घेण्यात आलेली आहे. मतदारांना मास्क, सॅनिटायझर लावून येण्याच्या सूचना दिलेल्या आहे. तर मतदान केंद्रांवरही मास्क, सॅनिटायझेशन आणि शरीराचं तापमान मोजण्यासाठीचे उपाय करण्यात येणार आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. करोना, पूर परिस्थिती आणि स्थलांतरित कामगार आदी मुद्दे या नि़वडणुकीत चर्चिले जाणार की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाभोवती निवडणूक फिरते हे पाहणं रंजक ठरणार आहे.