भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादांचा खात्मा केला होता. अत्यंत गोपनीय पद्धतीने भारतीय सुरक्षा दलांनी हे सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करून दाखवले. आज देशभरात केंद्र सरकार व ज्यांनी प्रत्यक्षात रणांगणात जाऊन ही कामगिरी केली त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये बिहार व डोग्रा रेजिमेंटच्या जवानांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बिहार व डोग्रा रेजिमेंटचे १९ जवान शहीद झाले होते. त्याचाच बदला या रेजिमेंटने घेतला असल्याचे बोलले जात आहे.
उरी येथे १९ सप्टेंबर रोजी पाक दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बिहार व डोग्रा रेजिमेंटचे १९ जवान शहीद तर अनेक जण जखमी झाले आहेत. लष्कराने आपल्या सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशनमध्ये बिहार व डोग्रा रेजिमेंटच्या जवानांचा समावेश केला होता. आपल्या जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी या दोन्ही रेजिमेंटच्या जवानांनी मोठ्या शर्थीने सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी झालेल्या जवानांना मदत केली. सर्जिकल स्ट्राईकचे जवान पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसत असताना पाकिस्तानी सैन्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी एका बाजूने गोळीबार सुरू ठेवला होता. त्यांच्या या कामगिरीमुळे ऑपरेशन यशस्वी होण्यास मोठी मदत झाली. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे तळ तर नष्ट केलेच शिवाय सुमारे ४० दहशतवादी व १० ते १५ पाकिस्तानी जवानांना ठार केले होते.