बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्याआधी प्रचारादम्यान जनता दल युनायटेडच्या एका आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. दरभंगामधील कुशेश्वरस्थानचे जेडीयूचे आमदार आणि यंदा उमेदवार असलेले शशि भूषण हजारी यांनी बिहारच्या जनतेबद्दल केलेलं वक्तव्य सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शशि यांनी माझ्या मतदारसंघामध्ये दरवर्षी पुराची समस्या असते. मात्र येथील लोकं कामाच्या शोधात इथर राज्यामध्ये जात नाहीत असा दावा करताना दिसतात. मात्र बिहारमधील काही ठिकाणचे लोकं केवळ हौस म्हणून राज्याबाहेर जातात असं वक्तव्यही शशि यांनी व्हिडीओमध्ये केलं आहे. याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

दुसऱ्या राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या बिहारी मदुरांऐवढेच पैसे गावातील मजुरांना मिळतात असा दावाही या व्हिडीओत जेडीयूच्या उमेदवाराने केला आहे. पूर येतो हे कारण देत केवळ हौस म्हणून इतर राज्यांमध्ये रोजगारासाठी जातात असंही शशि यांनी म्हटलं आहे.

“इतर राज्यांमध्ये कामासाठी गेलेल्यांना किती मजुरी देतात असं विचारल्यावर ते ५०० रुपये असं सांगतात. तर त्याच तुलनेत आपल्या येथे ३५० ते ४०० रुपये मजुरी दिली जाते. त्यामुळे काम करायची इच्छा असेल तर काम येथेही आहे. चार तास काम केल्यास मनरेगाअंतर्गत २०० रुपये मजुरांना मिळतात. मात्र बिहारमधील लोक हे हौशी असतात. त्यामुळे दोन ते चार महिने इथे पुराचा त्रास असतो तेव्हा लोकं विचार करतात, चला मुंबई-दिल्ली पण फिरुन होईल आणि रोजगारही मिळेल असा विचार करुन जातात. काहीजण तर पुराच्या काळात केवळ फिरण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जातात. मात्र पूर ओसरल्यावर शेतीच्या कामांसाठी पुन्हा बिहारमध्ये येतात,” असं शशि या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.  याच सर्व कारणांचा संदर्भत देत या मतदारसंघामधून मजुरांचे स्थलांतर हा महत्वाचा विषय नसल्याचे शशि यांनी म्हटलं आहे. आपल्या मतदारसंघामध्ये कामाची काहीच कमतरता नसून ज्यांना काम मिळत नाही त्यांना मनरेगाच्या अंतर्गत काम दिलं जातं असं शशि यांनी सांगितलं आहे.

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वरस्थान हा सर्वात कमी विकास झालेल्या भागांपैकी एख आहे. हा प्रदेश वर्षातील १२ महिन्यांपैकी पाच महिने पुराच्या पाण्याने वेढलेला असतो. दरभंगामध्ये आज मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाच्या एक दिवस आधीच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शशि यांना याचा फटका बसतो का हे निवडणुकीच्या निकालांमध्येच स्पष्ट होईल. रोजगार आणि मजुरांचे स्थलांतर हा सध्याच्या निवडणुकीमधील महत्वाचा मुद्दा असून सत्ताधाऱ्यांविरोधात या मुद्द्यांवरुन विरोधकांनी चांगलाच प्रचार केल्याचे चित्र दिसत आहे.