करोनाच्या दुसऱ्या लाटात देशातील आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याचं चित्र आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, बेड उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आता गावांमध्येही जाणवत आहे. गावांमध्ये अपुऱ्या आरोग्यव्यवस्थेमुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनातर्फे गावागावांमध्ये आरोग्यसुविधांवर भर देण्यात येत आहे. मात्र तरीही काही ठिकाणी याउलट चित्र आहे. प्रशासनातर्फे उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य व्यवस्थेचा काही ठिकाणी गैरवापर होताना दिसत आहेत. बिहारच्या एका गावामध्ये एका आरोग्य केंद्रात रुग्णांऐवजी चक्क गायी बांधण्यात आल्याचे समोर आला आहे. त्यामुळे बिहारच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

बिहार मधुबनीच्या खाजौलीतील सुक्की गावात सरकारी आरोग्य केंद्राचा वापर ऐन करोना काळातही गोशाळा म्हणून केला जात आहे. “गेल्या वर्षी या आरोग्य केंद्राला डॉक्टर किंवा कोणत्याही आरोग्य अधिकाऱ्याने भेट दिली नव्हती. लोक खजौली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात,” असे गावातील एका व्यक्तीचे म्हणणे आहे.

या आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात आलेले आरोग्य कर्मचारी करोनामुळे खजौली येथील प्राथमिक रुग्णालयात काम करत आहेत. गावातील हे आरोग्य केंद्र गेल्या ३० वर्षापासून सुरु असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोग्य केंद्रात गेल्या २० वर्षापासून गोशाळा चालवण्यात येत आहे. गावातील लोकांना आरोग्यासंदर्भातील समस्या असतील तर खाजगी रुग्णालयात जावे लागते. गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले तरी, त्याबद्दल माहिती लोकांना मिळत नाही. बिहारच्या या चार हजार लोकसंख्या असलेल्या गावात किरकोळ आजारांनी त्रस्त असलेले अनेक रुग्ण आहेत. काही करोनाबाधितांनी तर स्वखर्चाने घरीच स्वतःवर उपचार केले आहेत असे गावकऱ्यांनी सांगितले.

करोनामुळे येथील आरोग्य केंद्रातील व्यवस्था बंद आहे.. भाड्याच्या घरात हे आरोग्य केंद्र चालवण्यात येत आहे. घरमालकाने तिथे आपली जनावरे बांधली असावीत असे येथील आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. माध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचल्यानंतर बाजूच्या घरावर आरोग्य केंद्राचा बोर्ड लावण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.