बिहारच्या समाजकल्याणमंत्री परवीन अमानुल्लाह यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बिहारमधील नितीशकुमार सरकारला हादरा बसला आहे. नितीशकुमार यांच्याकडे अमानुल्लाह यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. विद्यमान यंत्रणेत काम करणे अशक्य असल्याचे कारण अमानुल्लाह यांनी दिले असून त्यांनी जद(यू)च्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. आपल्याला समाजकार्याची प्रथमपासून आवड असून यापुढे तेच करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अमानुल्लाह यांचे पती सध्या केंद्र सरकारच्या सेवेत उच्चपदावर आहेत. राजीनाम्याचे कारण अमानुल्लाह यांनी दिलेले नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांबाबत आपल्या मनात कोणताही राग नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.