बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील जलालपूर येथे अवैधरित्या उभारलेल्या फटाक्याच्या एका कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे ५ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. रात्री उशिराने झालेल्या या स्फोटात सुरूवातीला एकजण ठार तर २५ जखमी असल्याचे वृत्त आले होते. पण नंतर मृतांचा आकडा पाचपर्यंत पोहोचला. जखमींना जवळच्याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस आणि अग्निशामक घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.

ज्या कारखान्यात स्फोट झाला, तो भाग नालंदातील जलालपूर परिसरात येतो. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा कारखाना अवैधरित्या उभारण्यात आला होता, असे समजते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.