बिहारमधील गोपालगंज येथे प्रेम विवाह करणाऱ्या एका जोडप्याने लग्नाच्या पहिल्या रात्री (हनीमूनला) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सात फेरे घेतल्यानंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री या प्रेमी जोडप्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच या दोघांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांना गोरखपुरमधील रुग्णालयामध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आलं. ही घटना मीरगंज पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याचं सांगण्यात येत आहे. नवविवाहित जोडप्याने लग्नाच्या पहिल्याच रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसलाय.

नक्की वाचा >> गुजरातमध्ये दोन महिन्याच्या बाळाला 24*7 पोलीस सुरक्षा; कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याचे प्राण वाचले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जमशेदपुरमधील सोनाटे पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या २८ वर्षीय शांति देवीने गोपालगंजमधील मीरगंज शहरातील चंद्रिका सिंह यांच्या ३० वर्षीय मुकेश कुमार सिंह या मुलाशी शनिवारी लग्न केलं. थावे मंदिर येथे या दोघांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर रविवारी प्रथेप्रमाणे बहुभोजनाचा कार्यक्रम करण्यात आले. नातेवाईकांचा पाहुणचार केल्यानंतर सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर त्या रात्री दोघेही आपल्या बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले. मात्र रुममध्ये जाऊन दोघांनीही विषप्राशन केलं. दोघांनीही कार्यक्रमासाठी बनवलेल्या चिकनच्या डिशमध्ये विष मिसळून खाल्ल्याची शंका नातेवाईकांनी पोलिसांना माहिती देताना व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> गुजरातमधील धक्कादायक प्रकार… मास्क न घातल्याचं कारण देत ताब्यात घेतलेल्या महिलेवर हवालदाराने केला बलात्कार

मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री या दोघांनी विष पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न का केला याचा काहीच अंदाज त्यांच्या नातेवाईकांना नाहीय. दोघेही जण बेडरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आत्पकालीन विभागातील डॉक्टरांनी रात्री या दोघांवर उपचार केले. त्यानंतर या घटनेची माहिती नगर पोलीस स्थानकात कळवण्यात आली. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर चौकशीपासून वाचण्यासाठी या दोघांचे नातेवाईक चांगल्या उपचारांचं कारण देत दोघांनाही गोरखपुर येथील रुग्णालयामध्ये घेऊन गेल्याची माहिती न्यूज १८ ने दिलीय.

दोघांनी विष खाल्ल्याचं लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी या दांपत्याला उलटी व्हावी म्हणून मिठाचं पाणी पालं. मात्र त्यानंतरही त्यांना उलटी झाली नाही. त्यानंतर या दोघांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये आता प्रेमी जोडप्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याची वाट पोलीस पाहत असून त्यानंतरच चौकशी केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.