भाजपचे दोन आमदार नितीशकुमार यांना भेटले
लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) खासदाराने बुधवारी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये एनडीएला जोरदार झटका बसला आहे. दरम्यान, भाजपच्या ज्या दोन आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली.
वैशाली लोकसभा मतदारसंघातील लोकजनशक्ती पार्टीचे खासदार रामकिशोर सिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा आणि संसदीय पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा दिला. त्याचप्रमाणे राजस्थानचे पक्षाचे प्रभारी या पदाचाही त्यांनी राजीनामा दिला.
बिहार निवडणुकीचे जागावाटप करताना आपल्याला दूर ठेवण्यात आल्याने रामकिशोर सिंह यांनी पदांचे राजीनामे दिले. पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे ते निकटवर्ती मानले जातात. जागावाटपात लोकजनशक्ती पार्टीला केवळ ४० जागा देण्यात आल्याने पक्षातील अन्य नेतेही दुखावले आहेत.
दरम्यान, भाजपचे आमदार अमनकुमार आणि अजय मंडल यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी नितीशकुमार यांची भेट घेतली.
या निवडणुकीत सदर दोन आमदार जद(यू)-राजद-काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. स्वत: नितीशकुमार यांनीही या आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

पप्पू यादव निवडणूक लढवणार नाहीत?
नवी दिल्ली : राजदमधून हकालपट्टी करण्यात आलेले खासदार पप्पू यादव यांनी आपला पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत बुधवारी दिले. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांच्या आघाडीपासून राज्याला वाचविण्यासाठी कठीण निर्णय घेण्याची तयारी असल्याचेही पप्पू यादव यांनी सांगितले.
यादव यांनी जन अधिकार पार्टीची स्थापना केली आहे. पक्षाची गुरुवारी बैठक होणार असून त्यामध्ये बिहारमधील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवायाची की १०० अथवा एकाही जागेवर निवडणूक लढवायची नाही या बाबतचा निर्णय बैठकीत होणार आहे.