गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची आज जयंती. याच वर्षी १७ मार्च रोजी रोजी वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झालं. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर सामान्यांमधील असामन्य नेतृत्व गमावल्याची भावना भारतीयांनी व्यक्त केली होती. अनेक नेत्यांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी ट्विटवरुन पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली होती. पर्रिकर हे त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच साधेपणासाठीही ओळखले जायचे. मुख्यमंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्यांचे साधे रहाणीमान कायमच राहिले. मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते अनेक वर्ष वडीलोपार्जित घरातच राहत होते. अनेकदा गोवेकरांनी पर्रिकरांना स्कुटवरुन ऑफिसला जाताना पाहिले आहे. त्यांच्या अशाच साधेपणाचे अनेक किस्से गोवेकरांच्या चर्चेमध्ये सहज ऐकायला मिळतात. अशाच काही प्रसिद्ध किस्यांवर त्यांच्या जयंतीनिमित्त टाकलेली नजर…

>
पर्रिकरांच्या मुलाच्या लग्नात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या लग्नातील जवळजवळ सर्व पाहुणे सूट-बूटांमध्ये मध्ये आले होते. तर मुलाचे वडील म्हणजेच मनोहर पर्रीकर मात्र हाफ शर्ट आणि साध्या पॅन्ट मध्ये सर्वांचे स्वागत करताना दिसले.

>
मुख्यमंत्री असतानाही पर्रिकर सरकारी गाड्यांच्या ताफ्याऐवजी चक्क स्कुटरवरुन आपल्या कार्यालयात जात. अनेकदा गोवेकरांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुचाकीवरुन कामाला जाताना पाहिले आहे.

>
पर्रिकरांचे नियोजन कौशल्य अफाट होते. बऱ्याच वेळेला ते काम पूर्ण होईपर्यंत कार्यालयातच असायचे. पर्रिकर दिवसाला १५-१६ तास काम करायचे.

>
एकदा अर्ध्या रात्रीपर्यंत पर्रिकर त्यांचे ओएसडी असणारे (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) गिरीराज वर्नेकर यांच्या सोबत एक प्रकल्पावर चर्चा करत बसले होते. वेळेचा अंदाज आल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आली. जाताना वर्नेकरांनी, ‘उद्या कितीला येऊ?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा पर्रीकरांचे, ‘उद्या थोड्या उशिरा येऊ शकता, सकाळी ६:३० पर्यंत आलात तरी चालेल,’ हे उत्तर ऐकून वर्नेकरांना आश्चर्य वाटले. सकाळी जेव्हा वर्नेकर ६:१५ ला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी ‘ मुख्यमंत्री पहाटे ५:१५ वाजेपासूनच ऑफिसमध्ये काम करत असल्याचे सांगितले.

>
२००४ च्या गोवा फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात पर्रीकर पोलिसांसोबत कार्यक्रम स्थळाबाहेरील वाहतुक नियंत्रण करण्यात व्यस्त होते.

>
अनेकदा पर्रिकर गोव्यातील आपल्या आवडत्या ठिकाणी जाऊन पोटपुजा करुन यायचे.

>
२०१२ साली पर्रिकर तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पर्रीकर यांनी अभिनंदन करण्यासाठी मंचावर आलेल्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करत शुभेच्छा स्वीकारल्या.

>
आपल्या शिस्तीसाठी आणि वक्तशीरपणासाठी ओळखले जाणारे पर्रिकर हे आपल्या सहकाऱ्यांची खूप काळजी घेत. मार्च २०१२ साली गोव्याचे पर्यटन मंत्री मातनही सलदन्हा यांचा हृयविकाराच्या तिव्र झटक्याने आस्कमिक मृत्यू झाला. तेव्हा सलदन्हा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पर्रीकर यांना अश्रू अनावर झालेल्याचे अनेकांनी पाहिले होते.

>
२०१६ मध्ये पर्रिकर संरक्षण मंत्री असताना मुंबई आयआयटीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना त्यांचे एक जुने शिक्षक भेटले असता मंचावरच ते शिक्षकांच्या पाया पडले होते.

>
मुख्यमंत्री आणि त्यानंतर संरक्षण मंत्री झाल्यानंतरही पर्रीकर नेहमीच इकोनॉमी क्लासनेच प्रवास करत. अनेकदा सहप्रवाश्यांनी त्यांना ओळखल्यानंतर ते त्यांच्याबरोबर सेल्फी काढत, त्यांचे ऑटोग्राफ घेत. एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे ते स्वत:चे समान स्वतः नेत असतं. विशेष व्हिआयपी गेटने जाण्याऐवजी ते इतर सामान्य प्रवाशांप्रमाणे रांगेत उभे राहून बोर्डिंग बसमधूनच विमानापर्यंत जात असतं.

>
मध्यंतरी गोव्यातील एका लग्नाच्या रिसेप्शनच्या रांगेत उभे असलेल्या पर्रिकरांचा फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

अनेकांनी पर्रिकरांबद्दल आलेले असे अनुभव त्यांच्या निधनानंतर नेटकऱ्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले होते.