महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आदी ठिकाणी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांत मंगळवारी भाजप आणि मित्रपक्षांची सरशी झाल्याचे चित्र आहे. दंगलीने होरपळलेल्या मुजफ्फरनगरमधील भाजप उमेदवाराचा विजय हा विरोधकांनाही धक्का देणारा ठरला आहे. बिहारमध्ये नीतिशकुमार यांच्या आधाडीला हरलीखी येथील पराभवाने सत्तास्थापनेनंतर अवघ्या तीन महिन्यांतच धक्का बसला आहे. निवडणुकांचे हे निकाल म्हणजे लोकांनी विकासाच्या राजकारणाच्याच बाजूने दिलेला कौल आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे अमित घोडा यांनी काँग्रेसचे राजेंद्र गावित यांचा १८ हजार ९४८ मतांनी पराभव करून पालघर विधानसभा मतदारसंघ कायम राखला. शिवसेनेला ६७ हजार १२९ मते मिळाली. शिवसेनेच्या मनिषा निमकर यांनी यावेळी बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढविली होती. त्यांना ३६ हजार ७८१ मते मिळाली. उत्तर प्रदेशात सत्तारूढ समाजवादी पक्षाला दुहेरी हादरा बसला आहे. मुजफ्फरनगरत भाजपचे उमेदवार कपिल देव अगरवाल यांनी सपचे प्रतिस्पर्धी गौरव स्वरूप बन्सल यांचा ७,३५२ मतांच्या फरकाने पराभव केला.