पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. या आंदोलनावरून सध्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी नेते आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. अशातच, शेतीविषयक कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठीच जनतेने आम्हाला ३०३ जागांसह बहुमत दिलं, असे विधान केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.
पंतप्रधान मोदी मुकेश अंबानींच्या नातवाला पाहायला हॉस्पिटलमध्ये? जाणून घ्या सत्य…
द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत तोमर म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या टर्ममध्ये अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर मोदींचे सरकार पडणार असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. पण जनतेने दुसऱ्या टर्मसाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला २८७ वरून थेट ३०३ जागांसह बहुमत देत जिंकवलं. याचा असा अर्थ होतो की जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडून अशाच प्रकारच्या समाजोपयोगी आणि क्रांतीकारी निर्णयांची अपेक्षा आहे. जे लोक राजकीय स्वार्थासाठी, दडपणाखाली दबून किंवा मतपेट्यांच्या राजकारणामुळे आजपर्यंत देशात सुधारणा घडवू शकलेले नाहीत, त्या लोकांपेक्षा वेगळी भूमिका मोदी यांनी घ्यावी आणि विकासासाठी नवनवे निर्णय घ्यावे.”
“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या!”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा
शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. याबद्दल सरकार आणि कृषीमंत्री म्हणून पुढील रणनीती काय असेल? असा प्रश्नही तोमर यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं. “शेतकरी नेत्यांशी चर्चा सुरू आहे. ९ डिसेंबरच्या बैठकीत दिलेल्या प्रस्तावावर शेतकऱ्यांकडून काय उत्तर येतं याची वाट पाहतोय”, असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 16, 2020 1:05 pm