विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये असून यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. येथील भूमीने ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून देशाला एकत्र आणलं, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना बाहेरचे असं संबोधित करत असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी मोदींनी भाजपा सत्तेत आल्यास येथील भुमीपूत्रालाच मुख्यमंत्री करणार असं आश्वासन दिलं आहे.

“बंगाल ही रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, बंकीमचंद्र चॅटर्जी अशा महान लोकांची जमीन होती आणि येथे कोणताही भारतीय बाहेरचा नव्हता. बंगालने ‘वंदे मातरम’च्या माध्यमातून देशातील जनतेला एकत्र आणलं. पण ममतादीदी बाहेरील लोक असा उल्लेख करत आहेत. कोणताही भारतीय येथे बाहरेचा नव्हता, सर्व भारतमातेची मुलं आहेत,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मोदींचा ‘खोटारडे’पणाचा कारखानाच शिल्लक राहील – ममता

“आम्हाला पर्यटक बोललं जात आहे, खिल्ली उडवली जात आहे, अपमान केला जात आहे. दीदी रवींद्रनाथ टागोरांच्या बंगालमधील लोक कोणालाही बाहेरचा समजत नाहीत,” असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. मोदींनी यावेळी बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करेल तेव्हा येथील व्यक्तीच मुख्यमंत्री असेल असं आश्वासन दिलं.

आणखी वाचा- ‘मी कोब्रा आहे’ असं म्हणणाऱ्या मिथुन चक्रवर्तींचे नाव भाजपाच्या अंतिम यादीत नाही

ममता बॅनर्जींसोबत आतले आणि बाहेरचे असा वादा सुरु असतानाच नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य आलं आहे. ममता बॅनर्जी सतत बंगालमध्ये दिल्ली किंवा गुजरातमधून आलेल्या बाहेरच्या लोकांना राज्य करु देणार नाही असं सांगत आहेत. त्यालाच नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे.