खानाकुल, पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आले, तर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना महिनाभरात गजाआड करू, असा धमकीवजा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी येथील एका प्रचार सभेत दिला. ते म्हणाले की, आम्ही सत्तेवर आलो तर तृणमूलच्या गुंडांना शोधून काढून गजाआड करू. हुगळी जिल्ह्य़ातील सुदर्शन प्रामाणिक यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांचे खून झाले आहेत. त्यांना भाजप सत्तेवर आल्यानंतर न्याय मिळेल. मतमोजणी संपल्यानंतर आम्ही त्यांना धडा शिकवू हे मी सांगतो. उत्तर प्रदेशात चार वर्षांपूर्वी हेच घडले आहे. तेथे आम्ही सत्ता स्थापन केली, नंतर गुंडाराज मोडून काढण्यात आले. आम्ही लोकांना त्रास देणाऱ्यांना तुरुंगात टाकले. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख या गेली दहा वर्षे तुष्टीकरणाचे राजकारण करीत असून त्यांनी दुर्गापूजेत अडथळे आणले. सरस्वती पूजा व होळीसारखे सण होऊ दिले नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये असे कधी घडत नाही व घडणार नाही.