केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची धोरणे ठरविण्याची पद्धत पूर्वीच्या काँग्रेस सरकारप्रमाणेच आहे, त्यामध्ये निराळेपण नाही, केवळ गायीसारखे काही मुद्देच निराळे आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केली आहे. शौरी यांच्या टीकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून शौरी हे पक्षाचे सदस्यच नसल्याचे भाजपने म्हटले आहे.

दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन समारंभात शौरी म्हणाले की, रालोआचे विद्यमान सरकार आणि पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी सरकारच्या धोरणांत काहीही फरक नाही. त्यामुळे आताचे रालोआघाडीच्या सरकारचे निराळेपण जाणवत नाही, असेही ते म्हणाले.
शौरी हे भाजपचे सदस्य नाहीत असे स्पष्ट करून भाजपने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने अलीकडेच सदस्यत्व नोंदणी अभियान हाती घेतले होते, मात्र शौरी यांनी त्यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण केलेले नाही, असे भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी म्हटले आहे. शौरी यांनी नूतनीकरण केलेले नाही, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही शौरी यांचा आरोप फेटाळला.