मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय नाट्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात येऊन कोसळलं होतं. भाजपानं सरकार पाडल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसनं केला होता. या मध्य प्रदेशात मावळत्या वर्षात झालेल्या राजकीय भूकंपाबद्दल भाजपाच्या नेत्यानेच गौप्यस्फोट केला आहे. कमलनाथ यांचं सरकार पाडण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचीच भूमिका महत्त्वाची होती, असा भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे.

इंदौरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनात बोलताना भाजपाचे महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी मध्य प्रदेशातील सरकार भाजपानं पाडल्याचा गौप्यस्फोट केला. विजयवर्गीय म्हणाले,”जोपर्यंत कमलनाथ यांचं सरकार होतं, तोपर्यंत सुखानं झोपू दिलं नाही. भाजपाचा कुठला कार्यकर्ता असेल, जो कमलनाथ यांना स्वप्नातही दिसत असेल तर ते नरोत्तम मिश्रा होते. टाळ्या वाजवून मिश्रा यांचं स्वागत करायला हवं. मी इथे पडद्यामागील गोष्ट सांगत आहे, याची वाच्यता कुठे करू नका. मी सुद्धा आजपर्यंत कुणालाही सांगितलेली नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावरून सांगतोय. कमलनाथ यांचं सरकार पाडण्यात जर कुणाची महत्त्वाची भूमिका होती, तर ती नरेंद्र मोदी यांची होती. धर्मेंद्र प्रधान यांची नव्हती. पण, कुणाला ही गोष्ट सांगू नका. मी आजपर्यंत कुणाला सांगितली नाही,” असं म्हणत विजयवर्गीय यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

आणखी वाचा- …म्हणून राहुल गांधी संतापाच्या भरात संसदीय स्थायी समिती बैठक सोडून गेले

आमच्या आरोप खरे ठरले -काँग्रेस

कैलास विजयवर्गीय यांच्या दाव्यानं मध्य प्रदेशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. विजयवर्गीय यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर काँग्रेस भूमिका मांडताना आमचे खरे ठरले असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा म्हणाले,”भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी शेतकरी संमेलनात काँग्रेसनं केलेल्या सर्व आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. जनादेश मिळालेलं कमलनाथ यांचं सरकार नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून पाडण्यात आलं होतं.”