बिहारमध्ये NDA ची दिवाळी गोड झाली आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं अर्थात NDA ने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागांवर विजय मिळवला. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपानं, ४३ जागा जदयूनं तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. बिहार निवडणुकांमधील विजयानंतर भाजपामध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेला ०.०५ टक्के मत मिळाली. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिवसेनेपेक्षा नोटाला अधिक १.७४ टक्के मतं मिळाली आहेत. यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

“बिहारमध्ये शिवसेनेचं डीपॉझिट गुल. १ टक्का मतंदेखील नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?,” असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला.

आणखी वाचा- Bihar Election: “संजय राऊतांमुळे शिवसेनेची महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल”

एनडीए, महाआघाडीत चुरस

बिहारमध्ये मंगळवारचा संपूर्ण दिवस हा एनडीए आणि महाआघाडी यांच्यातल्या चुरस पाहण्याचा होता. कारण सुरुवातीला जसे कल हाती येऊ लागले तेव्हा महाआघाडी जिंकते आहे असं दिसू लागलं होतं. मात्र त्यानंतर हे चित्र बदललं. झुकतं माप एनडीएकडे जाऊ लागलं. दरम्यान एनडीए बहुमताकडे जाईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महाआघाडीही त्यांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसली. रात्रीपर्यंत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल असेही अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवले. मात्र तसं काहीही न घडता एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत.