केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करतायेत. तर, या मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत देखील सतत भाष्य करत असून ट्विटरच्या माध्यमातून या आंदोलनाचा विरोध करत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी आज्जींबद्दल फेक ट्विट केलं होतं, त्यावरुन वाद वाढल्यानंतर तिने ते ट्विट डिलीट केलं. पण, त्या ट्विटवरुन कंगनाला अजूनही प्रचंड टीकेचा सामना करावा लागतोय. अनेक कलाकार कंगनाच्या त्या ट्विटवर संताप व्यक्त करत आहेत. अशातच आता भाजपाचे नेता आणि राष्ट्रीय प्रवक्ता आरपी सिंह यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे.

आरपी सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये कंगना रणौतला जाहीर माफी मागण्यास सांगितलं आहे. “तुझ्या धैर्याचा आणि अभिनयाचा मी आदर करतो. पण, कोणी माझ्या आईचा अवमान केला किंवा अनादर केला तर सहन करणार नाही…असं केल्यामुळे तू जाहीर माफी मागायला हवी”, अशा आशयाचं ट्विट आरपी सिंह यांनी केलं आहे. आपल्या ट्विटसोबत सिंह यांनी कंगनाने डिलीट केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉटही जोडला आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी आजीबद्दल फेक ट्वीट केलं होतं. ही आज्जी १०० रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात जाते असं तिने ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, नंतर तिने हे ट्विट डिलीट केलं.

आणखी वाचा- “थोडीही लाज वाटत असेल तर माफी माग”, दिलजीत दोसांजनंतर मिका सिंग कंगनावर संतापला

दरम्यान, कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. ‘अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या ट्वीटर अकाऊंटवरून वारंवार समाजात दुही व द्वेषभावना निर्माण करणारे, सामाजिक सौहार्दता व बंधुभाव बिघडण्यास चिथावणी देणारे, विशिष्ट धर्माची प्रतिमा मलीन करणारे ट्वीट केले जात आहेत. याविषयी ट्वीटर इन्कॉर्पोरेशन कंपनीकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कंगनाचे ट्वीटर अकाऊंट कायमचे स्थगित किंवा बंद करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच ट्वीटर इन्कॉर्पोरेशनला आपल्याच नियमांचे व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत’, अशा विनंतीची याचिका अॅड.अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.