महात्मा गांधी यांच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाली, असं विधान मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर व भाजपा नेते रामेश्वर शर्मा यांनी केलं आहे. शेतकरी सन्मान कार्यक्रमात शर्मा यांनी हे वक्तव्य केलं. शर्मा यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भोपाळमधील गांधी नगर परिसरात आयोजित कार्यक्रमाला रामेश्वर शर्मा हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शर्मा यांनी भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवलं. शर्मा म्हणाले,”काय आहे… नावामुळे गैरसमज तयार होतात. दिग्विजय सिंह यांचं काम आणि व्यवहार मोहम्मद अली जिनापेक्षा जास्त धोकादायक आहे. आधी जिनांनी देशाचं विभाजन केलं. १९४७ मध्ये बापूंकडून चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे पडले. तसं विभाजन सिंह करत आहेत,” असं शर्मा यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- देशभरात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव व्हावा म्हणून शेतकरी आंदोलक बिर्याणी खातायत; भाजपा आमदाराचा दावा

रामेश्वर शर्मा यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध विधान केलं होतं. “दगडफेक करणाऱ्यांचं काँग्रेस समर्थन करत असेल, तर त्यांनी समोर यावं. काँग्रेस दगडफेकीच्या घटनांची जबाबदारी घ्यायला हवी. राज्यातील सामाजिक सौहार्द खराब करण्याची परवानगी कुणालाच नाही. त्यामुळेच सरकार कडक कायदे करण्यावर काम करत आहे,” असं ते म्हणाले.