करोनाशी लढा सुरू असतानाच देशावर आर्थिक संकट ओढवलं आहे. देशाचा जीडीपी चार दशकांमध्ये पहिल्यांच प्रचंड घसरला आहे. जीडीपीच्या आकड्यांबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं. ही आकडेवारी समोर आल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यातच काँग्रेसने नेते सलमान निझामी यांनी तर मुघलांच्या काळात भारताची परिस्थिती अधिक चांगली होती असा टोला केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना लगावला आहे.

जीडीपीसंदर्भातील आकडेवारी समोर आल्यानंतर सलमान यांनी मुघलांच्या काळात भारताचा जीडीपी २५ होता आणि आता पाहा अशा अर्थाचे ट्विट केलं होतं. यावरुनच सोशल नेटवर्किंगवर मोदी समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच शाब्दीक देवाणघेवाण झाली. त्यानंतर सलमान यांनी ट्विटरवरुन आपली भूमिका स्पष्ट करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “भाजपाचे नेते मुघलांना रोज शिव्या देतात. मात्र खरं हे आहे की मुघलांच्या कालावधीमध्ये भारताचा जीडीपी २५ टक्के इतका होता आणि आज वजा २३.९ टक्के इतका आहे. अकबराच्या काळात भारतीय लोकं अमेरिकन लोकांपेक्षा श्रीमंत होते. आज शेजारच्या बांगलादेशची अर्थव्यवस्था ही भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहे,” अशी कॅप्शन या व्हिडिओला सलमान यांनी दिली आहे.

दोन मिनिटं २० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सलमान यांनी मुघलकाळापासून आतापर्यंत जीडीपीमध्ये कसा बदल झाला आहे याबद्दल मत मांडले आहे. “भाजपाचे नेते दिवसरात्र मुघलांना शिव्या देतात. काँग्रेसच्या नेत्यांना शिव्या देतात. नेहरुंना शिव्या देतात. मात्र मुघल काळात आपल्या देशाचा जीडीपी २५ टक्के होता. एकेकाळी तर ३० टक्क्यांपर्यंत होता भारताचा जीडीपी. जेव्हा अकबर भारतावर राज्य करत होता तेव्हा भारत हा अमेरिकेपेक्षा श्रीमंत होता. त्यानंतर भारतावर ब्रिटीशांची सत्ता आली. त्यांनी भारताला लुटलं तरी ब्रिटीशांच्या काळात भारताचा जीडीपी चार टक्के इतका होता. २५ वरुन जीडीपी चारवर आला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसकडे सत्ता आली. त्यानंतर नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यासारख्या नेत्यांनी नेतृत्व केलं. त्यावेळी देशाचा जीडीपी १० टक्क्यांवरुन अगदी १२ पर्यंत गेला होता. मनमोहन सिंग यांच्यावर ते सतत गप्प असतात काही बोलत नाही असे आरोप झाले त्यांच्या कालावधीमध्ये देशाचा जीडीपी १० ते १२ टक्क्यांदरम्यान होता,” असं सलमान म्हणाले. पुढे बोलताना सलमान यांनी, “रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त येतो अशी एक म्हण आहे ना त्याप्रमाणे आहे हे. मनमोहन सिंग शांत असायचे, कमी बोलायचे मात्र सर्वात उत्तम पंतप्रधान होते. आता भाजापच्या कार्यकाळात बाघा. करोना असू द्या किंवा त्याआधीचे सहा वर्ष असू द्या या कालावधीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांसमोर आहे. चार टक्क्यांच्यावर कधी वाढ झालीच नाही भाजपाच्या कार्यकाळात. काँग्रेसच्या काळात १२ होती वाढ आणि भाजपाच्या काळात ४ टक्क्यांपासून खाली खाली येत आताची परिस्थिती आली आहे,” असं मत व्यक्त केलं आहे.

अन्य एका ट्विटमध्ये सलमान यांनी भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये मुघलांच्या काळात बांधकाम करण्यात आलेली स्थळे अव्वल स्थानी असल्याचे सांगणारा लेख शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी “मुघलांकडे दूरदृष्टी होती. त्यांनी स्वत:चे पुतळे उभारले नाहीत. त्यांनी ताज महाल, लाल किल्ला यासारख्या गोष्टी उभारल्या. ज्या आजही पर्यटकांना आकर्षित करतात आणि सरकारी तिजोरीला आर्थिक हातभार लावतात. जे मुघलांना शिव्या घालतात त्यांना त्याचे गुजरात मॉडेल भिंतींमागे लपवावे लागतं आहे,” असा टोलाही लगावला आहे.


सलमान यांनी काल केलेल्या ट्विटनंतर Mughals या शब्दाचा वापर करुन २१ हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. यामध्ये सलमान यांचे समर्थक आणि विरोधक दोघांचाही समावेश आहे.