नोटाबंदी, जीएसटी, बँक घोटाळे आदी बाबींमुळे देशातील सामान्य नागरिकांनाही त्रास झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारने गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली.

ममता यांनी मंगळवारी नवी दिल्लीत अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यात राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह टीडीपी, टीआरएस आदी पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता. भाजपविरुद्ध सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे, असे ममता म्हणाल्या. निवडणूक आयोगाच्या आधीच भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याबद्दलही त्यांनी टीका केली. देशातील सर्व संस्था भाजपच्या संस्था बनत असून भाजपने त्यांचा गैरवापर चालवला आहे, असे ममता म्हणाल्या.