आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी भारतीय जनता पक्षाला नेहमी अडचणीत आणणारे मित्रपक्ष सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. भाजपा आपल्या फायद्यासाठी देशभरात दंगली घडवू शकतं असा आरोप ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे.

ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजपासमोर अडचणी उभ्या करणारं वक्तव्य करत म्हटलं आहे की, ‘भाजपा देशभरात जातीय दंगली घडवू शकतं’. एका रॅलीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी अमेरिकेने दिलेल्या त्या अहवालाचा उल्लेख केला ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीआधी भारतात जातीय दंगली होऊ शकतात असं सांगण्यात आलं होतं. राजभर यांनी या दंगली भाजपाच करु शकतं असं म्हटलं आहे.

‘दंगल घडवून हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडणाऱ्या नेत्यांना जिवंत जाळलं पाहिजे’

पुढे त्यांनी म्हटलं की, ’21 फेब्रुवारीला राम मंदिराच्या नावे लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. भाजपा संध्या दंगली घडवण्याच्या मूडमध्ये आहे. भाजपाचे लोक मतं मिळवण्यासाठी काहीही करु शकतात’. राजभर यांनी यावेळी हिंदू आणि मुस्लिमांना एकजूट राखण्याचं आवाहन केलं आहे.

याआधी राजभर यांनी जातीय दंगलीत फक्त सामान्य लोकांचाच मृत्यू का होतो ? राजकीय नेते का नाही ? असा प्रश्न विचारला होता. ‘हिंदू मुस्लिम दंगलीत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा कधी मृत्यू झाला का? राजकीय नेत्यांचा मृत्यू का होत नाही? धर्माच्या आधारे भांडणं लावत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांना जिवंत जाळलं पाहिजे. यानंतरच त्यांना कळेल आणि इतरांना ‘जाळणं’ बंद करतील’, असं ओ पी राजभर यांनी म्हटलं होतं.