कोलकाता येथे विरोधकांच्या रॅलीमध्ये शनिवारी अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी, खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींविरोधात आणि भाजपाविरोधात दंड थोपटले होते. गेल्या काही वर्षांपासून सिन्हा भाजपाच्या पक्षनेतृत्वावर सातत्याने टीका करत आहेत. पण आता भाजपाने पहिल्यांदाच सिन्हा यांच्या वक्तव्यांची नोंद घेतली असून लवकरच त्यांचं पक्षातून निलंबन केलं जाण्याची शक्यता आहे.

‘भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सिन्हा यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. यावेळी सिन्हा यांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे, त्यांनी त्यांची पातळी ओलांडली असून सिन्हा हे संधीसाधू आहेत’, अशी टीका भाजपाचे प्रवक्ता राजीव प्रताप रूडी यांनी केलीये. ‘सिन्हा खासदार असल्याचे फायदे घेऊ इच्छितात. म्हणूनच पक्षाने व्हीप जारी केल्यावर ते संसदेत हजर राहतात. पण, इतर पक्षांच्या व्यासपीठावर जाऊन सरकारवर टीका करतात. ते संधीसाधू आहेत. पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल’ असा विश्वास असल्याचे रुडी म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा यांनी नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीचा निर्णय यावरही टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा असंही म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी एका डेलिसोप मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीला मंत्रीपद देऊ शकतात मग मी काय वाईट होतो? अशी सगळी वक्तव्यं केली आहेत त्यात आता विरोधकांच्या मंचावरून होय मी आहेच बंडखोर असं शत्रुघ्न सिन्हा म्हटले आहेत. आतापर्यंत शत्रुघ्न सिन्हा यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याची पद्धतच भाजपाने अवलंबली होती. पण, यावेळी प्रथमच भाजपा प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांच्या वक्तव्यामुळे सिन्हा यांच्यावर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.