राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना मागे हटत नाहीत. मात्र अनेकवेळा यामुळे नंतर मोठा वाद निर्माण होतो. असेच एक वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबाबत केले आहे. ते म्हणाले, पूर्वी राहुल गांधी यांना ‘पप्पू’ म्हटले जात होते. पण आता त्यांचे नाव ‘गाढवांचा बादशाह’ ठेवण्यात आले आहे.

आकाश म्हणाले की, त्यांना (राहुल गांधी) सर्व लोक पप्पू म्हणत असत. जे एक साधं-सरळ आणि प्रेमळ असे नाव होतं. पण आता ते देशद्रोह्यासारखे वागत आहेत. त्यामुळे त्यांचं नाव पप्पू बदलून गाढवांचा बादशाह असे ठेवण्यात आलं आहे. आकाश विजयवर्गीय यावरच थांबले नाहीत. त्यांनी एक मोर्चा काढून राहुल गांधी हे गाढवांचा बादशाह असल्याचे सांगितले.

आकाश विजयवर्गीय यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. काँग्रेस पक्षाकडून ओसामा बिन लादेनचा सन्मान करणे, लष्कराच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि पुलवामा हल्ला हा एक अपघात असल्याच्या त्यांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेस नेत्यांना गाढवांचा बादशाह अशी उपाधी देत आहोत, असे त्यांनी म्हटले.