उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुरेंद्र सिंह यांनी शूर्पणखा असं म्हटलं. पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसून लवकरच पश्चिम बंगाल जम्मू-काश्मिरप्रमाणे बनेल असंही ते म्हणाले.

मंगळवारी जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात सिंह बोलत होते. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपा सरकार असलेल्या राज्यामंधून सर्व दहशतवादी पळून बंगालला गेले आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस बंगाल देखील जम्मू-काश्मिर बनेल असंही सिंह म्हणाले. ममता बॅनर्जी या शूर्पणखा आहेत आणि त्यांचं नाक कापायला लक्ष्मणाने जन्म घेतलाय. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून शूर्पणखाचं नाक कापतील असं सिंह म्हणाले.

काँग्रेस रावण आणि ममता शूर्पणखा-
ममता शूर्पणखाचं पात्र साकारत आहेत तर काँग्रेस रावणाच्या भूमिकेत आहे, असं पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना सिंह म्हणाले. ज्या प्रमाणे काश्मीरमधून हिंदूंना पळवून लावण्यात आलं त्याचप्रमाणे बंगालमधूनही हिंदूंना पळवून लावलं जाईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पश्चिम बंगालमध्ये रामराज्य आणतील आणि बंगालमध्ये बिभिषणाचा राज्याभिषेक होईल.

यापूर्वी, उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरचा बचाव करताना तीन मुलांच्या आईसोबत कोणी बलात्कार करतं का असं सुरेंद्र सिंह म्हणाले होते.