काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या इटलीत असून तेथून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत आपण मान आणि सन्मानाने लढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान राहुल गांधी परदेशात असल्याने टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांनी पुन्हा एकदा यानिमित्ताने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत तुम्ही बिनधास्त फिरा असा टोला भाजपा नेत्याने लगावला आहे.

…म्हणून राहुल गांधी इटली दौऱ्यावर; खरं कारण आलं समोर

भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत तुम्ही चिंता न करता फिरु शकता. आनंद लुटू शकता. पार्टी हार्ड”.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे –
“नवीन वर्ष सुरु होत असताना ज्यांना आपण गमावलं आहे त्यांची आठवण काढत आहोत. तसंच ज्यांनी आपली सुरक्षा केली आणि बलिदान दिलं त्या सर्वांचे आभार मानत आहोत. मी मान आणि सन्मानाने अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेतकरी आणि कामगारांसोबत आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा”.

राहुल गांधी यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या एका महिन्यापासून पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांमधील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द व्हावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आतापर्यंत सहावेळी शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये चर्चा झाली आहे. पण अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.

“मान आणि सन्मानाने लढणाऱ्या शेतकऱ्यांसोबत…,” राहुल गांधींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. २४ डिसेंबरला याच मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्या यावेळी त्यांनी राष्ट्रपतींसमोर मांडल्या.

रविवारी राहुल गांधी भारताबाहेर गेल्याने टीकेला सामोरं जावं लागलं होतं. देशात शेतकरी आंदोलन सुरु असताना आणि काँग्रेसचा स्थापना दिवस असतानाच राहुल गांधी देशाबाहेर गेल्याने भाजपा नेत्यांनी टीका केली होती. राहुल गांधी आजी आजारी असल्याने इटलीला गेल्याचं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी सांगितलं होतं.