आज (गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला देशातूनच नाही, तर जगभरातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनादेखील या शपविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले होते. परंतु त्यांनी या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरूवारी भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी या शपथविधी सोहळ्याचा उपस्थित राहूच नये, असे ते म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहूच नये. त्यांनी लोकशाहीत हिंसाचार केला आहे. अशा प्रकारच्या सोहळ्यांमध्ये सहभागी होऊन इतरांच्या डोळ्यात डोळे घालून त्या बघूच शकत नाहीत, असे मनोज तिवारी यांनी बोलताना सांगितले.  यापूर्वी ममता बॅनर्जी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार होत्या. परंतु अखेरच्या क्षणी माघार घेत त्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला.

‘तुमचे संविधानिक आमंत्रण स्वीकारले होते आणि तुमच्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. पण गेल्या काही दिवसांमधील रिपोर्ट्स पाहिले. त्यामध्ये भाजपाने ५४ कार्यर्त्यांच्या परिवाराला बोलवलं आहे. ज्यांची हत्या राजनैतिक हत्या झाल्याचे सांगितले जाते. त्याचा संबंध पश्चिम बंगालमधील वैयक्तिक हत्येशीही आहे. पण बंगालमध्ये अशी कोणतीही राजकीय हत्या झालेली नाही. बंगालमध्ये झालेल्या हत्या वैयक्तिक भांडणामुळे झाल्या आहेत. त्याचा राजकाराणाशी काही संबंध नाही. त्याला राजकीय रंग दिला जातोय. त्यामुळे सॉरी नरेंद्र मोदीजी आपल्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही,’ असे सांगत त्यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यानंतर कैलास विजयवर्गीय यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला होता.