गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या भाजपाच्या उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विविध मागण्यांसाठी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी नाशिकहून मुंबईतील आझाद मैदानावर आलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे माओवादी हात आहे का ? याचा शोध घेतला पाहिजे, असे म्हणत त्यांनी आंदोलनाला नक्षली चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला.

कलाकार, साहित्यिकांनी फालतू भाष्य करू नये!

या शेतकऱ्यांच्या हाती लाल झेंडे असून ते कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहेत. आंदोलन शांत पद्धतीने होत आहे. पण यामागे नक्षली आहेत का याचा शोध घेतला पाहिजे असे त्या म्हणाल्या. लोकशाहीत आंदोलन केलीच पाहिजे. आतापर्यंत आंदोलने होतच आलीत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन अत्यंत शांत पद्धतीने झाले. कर्जमाफी झाली आहे. त्यांनाही ते मान्य आहे. पण त्यांना आणखी काय अपेक्षित आहे हे ऐकून घेऊन त्यावर निश्चितच तोडगा काढला जाईल, असे त्यांनी म्हटले.

त्या म्हणाल्या, सध्या शहरी नक्षलवाद (माओवाद) वाढतोय. ते चाळीशीला पीएचडी करतात.. आपल्या देशात ५४ नक्षल प्रभावित जिल्हे आहेत. तिथे ते शिक्षणाच्या विरोधात, साक्षरतेविरोधात काम करतात.

पूनम महाजन यांनी यापूर्वीही पुण्यात साहित्यिक आणि कलाकारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारचे नाव न घेता ‘राजा तुझं चुकलंच’, असा उल्लेख आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता. तोच धागा पकडून महाजन यांनी साहित्यिक आणि कलाकरांनी राजकारणाविषयी फालतू भाष्य करू नये असा नाहक सल्ला दिला होता.

विचारांना एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी कला आणि साहित्य आवश्यक असते. लोकशाहीमध्ये राजकीय भाष्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, कलाकार आणि साहित्यिकांकडून सकारात्मकतेची अपेक्षा आहे. कला, साहित्याबाबत कलाकार आणि साहित्यिकांनी जरूर सूचना कराव्यात. मात्र, ‘राजा काय करतो, प्रजा काय करते यावर कलाकार, साहित्यिकांनी फालतू भाष्य करू नये’, असा सल्ला पूनम महाजन यांनी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे नाव न घेता दिला होता.