देशाच्या माजी पंतप्रधानं इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं इंदिरा गांधी यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना अभिवादन केलं जात आहे. याच निमित्तानं भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. या पत्राचा हवाला देत स्वामी यांनी सवाल उपस्थित केले आहेत. नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी एक ट्विट करत एक पत्र शेअर केलं आहे. हे पत्र इंदिरा गांधी यांनी पतप्रधान असताना लिहिलं होतं. या पत्राचा हवाला देत स्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा आहे. "इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना हे काय लिहिलं आहे? याचं टीडीकेकडे (काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून केलेला शब्दप्रयोग) उत्तर आहे का?", असा सवाल स्वामी यांनी उपस्थित केला आहे. This is what Indira Gandhi wrote as PM. Does TDK have an answer? pic.twitter.com/uUT7LjaMMZ — Subramanian Swamy (@Swamy39) October 31, 2020 पत्रात काय म्हटलं आहे.? सुब्रमण्यम स्वामी यांनी जे पत्र शेअर केलं आहे, त्यावर २० मे १९८० अशी तारीख आहे. या पत्रात म्हटलेलं आहे की, "मला ८ मे १९८० रोजी आपलं पत्र मिळालं. ब्रिटिश सरकारविरुद्ध वीर सावरकर यांनी दाखवलेल्या धाडसाचं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात वेगळं महत्त्व आहे. भारताच्या या असामान्य पुत्राची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करते," असं पत्रात म्हटलेलं आहे. या पत्रावर सुरुवातीलाच भारताचे पंतप्रधान असा उल्लेख आहे. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांचं नाव आणि स्वाक्षरीही आहे.