नव्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात चाललेल्या शेतकरी आंदोलनातल्या किसान पंचायतील रविवारी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संबोधित केलं. यावेळी किसाम पंचायतीच्या या मंचावरुन त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचप्रमाणे भाजपा दंगली घडवून आणणारा पक्ष असल्याचं सांगत त्यांनी सत्ता नेस्तनाबूत करण्याचं आव्हानही दिलं होतं. मात्र भाजपानेही आता त्यांच्यावर पलटवार केला आहे.

राकेश टिकैत यांच्या एका ट्विटला उत्तर देताना भाजपाचे उत्तरप्रदेशचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, २० हजार जणांनाही एकत्र करता आलं नाही पण दावा मात्र २० लाखांचा करतायत. चार फोटो ट्विट केलेत त्यातही स्वतःचाच चेहरा दाखवताय. असं ऐकलंय की, मिया खलिफा येणार या अफवेमुळे थोडीफार गर्दी जमली होती पण ते सगळे लोक निराश होऊन निघून गेले.


हरियाणात शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर, रविवारी उत्तर प्रदेशात मुझफ्फनगरमधील महापंचायतीत शेतकरी संघटनांनी भाजपविरोधातील आक्रमक आंदोलनाचे रणशिंग फुंकले. इथे आगामी सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होत असून योगी सरकारविरोधात मिशन उत्तर प्रदेश सुरू केले जाणार असून २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. महापंचायतीला १० लाख शेतकऱ्यांची गर्दी झाल्याचा दावा मोर्चाने निवेदनाद्वारे केला.

या देशाची संपत्ती विकणारे कोण (मोदी) आहेत हे लोकांना समजले पाहिजे. त्यासाठी मुझफ्फरनगरसारख्या जंगी महापंचायती घेतल्या जातील. उत्तर प्रदेश वा उत्तराखंड भाजपपासून वाचवायचा नाही तर, संपूर्ण देशाला वाचवले पाहिजे. मोदी सरकार शेतजमीन, महामार्ग, वीज, आयुर्वमिा कंपनी, बँका अशी देशाची सगळी संपत्ती अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या कंपन्यांना विकत आहे. अवघा देश मोदी सरकारने विकायला काढला आहे असा आरोप करत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी रविवारी किसान महापंचायतीतील भाषणात केला. पश्चिम उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर हा टिकैत यांच्या शेतकरी संघटनेचा गड मानला जातो. २०१७ मध्ये या भागांतील ७२ विधानसभा मतदारसंघांत भाजपने वर्चस्व मिळवले होते.