शेवटच्या पायरीवर उभ्या व्यक्तीच्या आयुष्यातही बदल घडवणं हाच लोकशाहीचा मुख्य हेतू असल्याचं केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी सोमवारी राजस्थान विधानसभेत आयोजित परिसंवादात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांसह इतरांनाही टोले लगावले असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळेच दु:खी आहेत. मुख्यमंत्र्यांना आपण कधीपर्यंत राहू आणि कधी जाऊ याचा भरवसा नसल्याने दु:खी आहेत टोला त्यांनी लगावला.

भाजपाने गेल्या काही महिन्यात चार राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले असल्याने नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा आहे. सोमवारी विजय रुपाणी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

“समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगलं खात मिळालं नाही म्हणून दु:खी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही म्हणून दु:खी आहेत. आणि मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही,” असं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं.

नितीन गडकरी यांनी यावेळी शरद जोशी यांचा उल्लेख करत सांगितलं की, त्यांनी लिहिलं होतं जे राज्यात काम करत नाहीत, त्यांना दिल्लीत पाठवण्यात आलं. जे दिल्लीत कामाचे नव्हते त्यांना राज्यपाल बनवण्यात आलं आणि जे तिथेही कामाचे नव्हते त्यांना राजदूत बनवण्यात आलं. भाजपाध्यक्ष असताना दु:खी नाही अशी एकही व्यक्ती आपल्याला भेटली नाही असंही यावेळी ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “मला एका पत्रकाराने तुम्ही इतक्या मजेत कसे राहू शकता असं विचारलं होतं. मी सांगितलं, मी भविष्याची चिंता करत नाही. जो भविष्याची चिंता करत नाही तो आनंदी राहतो. एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे खेळत राहा. मी सचिन तेंडूलकर आणि सुनील गावसकर यांना लांब षटकार मारण्याचं रहस्य विचारलं होतं तेव्हा त्यांनी हा कौशल्याचा भाग असल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे राजकारणदेखील कौशल्य आहे”.

विरोधी पक्षात राहणारे सत्तेत येऊनही विरोधकांप्रमाणे वागतात

गडकरींना यावेळी सांगितलं की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वॉटरगेट प्रकरणानंतर पद सोडावं लागलं होतं. राष्ट्राध्यक्ष पदावरुन दूर झाल्यानंतर त्यांना लोकांना कॉलनीत राहण्यासाठी घर दिलं नव्हतं. निक्सन यांनी व्यक्ती पराभव झाल्याने नव्हे तर लढा न दिल्याने संपते असं लिहिलं होतं. आपल्याला आयुष्यात लढायचं आहे. कधी कधी आपण सत्तेत असतो, तर कधी विरोधी पक्षात असतो. हे सुरुच असतं. जे जास्त वेळ विरोधी पक्षात असता ते सत्तेत येऊनही विरोधी पक्षाप्रमाणे वागतात. आणि जे जास्त काळ सत्तेत राहणारे विरोधी पक्षात जाऊनही सत्ते असल्याप्रमाणे वागतात. त्यांना सवय लागलेली असते”.

…गडकरींना जेव्हा काँग्रेस प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती

नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्याला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाली होती असा खुलासा केला. “नागपूरमधील काँग्रेसचे नेते डॉक्टर श्रीकांत माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी १७ हून अधिक विषयांमध्ये पीजी केली आहे. त्यावेळी जेव्हा मी निवडणूक हारलो होतो तेव्हा भाजपाची स्थिती आज आहे तशी नव्हती. त्यावेळी त्यांनी मला नितीन तू चांगला आहेस, पण तुझ्या पक्षाचं भवितव्य नाही.. तू काँग्रेसमध्ये ये असं सांगितलं होतं. त्यावेळी मी नम्रपणे नकार दिला होता. चढ-उतार येत असतात, पण आपण आपल्या विचारधारेशी निष्ठा राखली पाहिजे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

गुजरातचे मुख्यमंत्री बदलल्याने गडकरींच्या वक्तव्याची चर्चा

दरम्यान नितीन गडकरी यांनी मंत्री आणि मुख्यमंत्री दु:खी असल्याचं सांगत आपल्या पक्षालाही टोला लगावल्याची चर्चा आहे. रविवारीच भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना संधी दिली. केंद्रातील अनेक दावेदार मंत्री होऊ शकले नसून, राज्यातही अशीच परिस्थिती आहे. राजस्थानातही मंत्रीमंडळ विस्तारावरुन गेल्या वर्षभरापासून रस्सीखेच सुरु आहे.