नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पक्षाचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सेनापती आहेत. या भूमिकेत कोणताही फेरबदल होणार नाही, असे पक्षाचे सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलातील युती तुटण्याच्या मार्गावर असताना प्रधान यांनी मित्रपक्षांसाठी भाजप आपल्या भूमिकेत कोणताही बदल करणार नसल्याचे स्पष्ट केले.
लालूप्रसाद यादव यांच्या ‘जंगलराज’च्या विरोधात बिहारमधील जनतेने भाजप आणि संयुक्त जनता दल यांच्या युतीला निवडून दिले. त्यामुळे ही युती तुटावी, असे मला तरी वाटत नाही. युती टिकून राहावी, यासाठी आतापर्यंत अनेक गोष्टींचा भाजपने त्याग केलाय, याकडे प्रधान यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, देशातील जनता कॉंग्रेसच्या कारभाराला वैतागलीये. कॉंग्रेसला पराभूत करण्याची जबाबदारी भाजपच्या खांद्यावर आहे. या सगळ्याचा विचार करूनच पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदी यांची प्रचारप्रमुखपदी निवड करण्याचा निर्णय घेतलाय.