प्रियंका गांधी ही माझी बहीण असून बहिणीसोबत काम करता येईल, याचा मला आनंदच आहे, असे सांगतानाच प्रियंकाच्या एंट्रीमुळे भाजपाही घाबरली आहे, असा चिमटा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाला काढला आहे. उत्तर प्रदेशला आम्हाला नवीन दिशेला न्यायचे असून त्यासाठीच प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारख्या तरुण नेत्यांना आम्ही जबाबदारी सोपवली आहे, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवले असून त्यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे. प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवून राहुल गांधी यांनी ते अपयशी ठरल्याचे सिद्ध केले, अशी टीका भाजपाने केली आहे. यावर आता राहुल गांधी यांनीही पलटवार केला आहे. प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसमधील प्रभावी नेते आहेत. मी त्यांना दोन महिन्यांसाठी उत्तर प्रदेशात पाठवले नाही. आम्हाला उत्तर प्रदेशला नंबर १ चे राज्य करायचे आहे, म्हणूनच अशा सक्षम नेत्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवले आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळेच भाजपा घाबरली आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

गरीब, दुर्लक्षित घटकांसाठी काम करणे ही काँग्रेसची विचारधारा आहे. आम्ही विकासाचे राजकारण करतो. आम्ही कधीही बॅकफुटवर खेळत नाही. आम्ही फ्रंटफुटवर खेळतो आणि आगामी निवडणुकीतही आम्ही तयारीने रिंगणात उतरु, असे त्यांनी सांगितले. मायावती आणि अखिलेश यादव यांचा मी आदर करतो. त्यांनी आघाडी केली आहे. मात्र, काँग्रेस, सपा, बसपा या तिन्ही पक्षांचे एकच लक्ष्य आहे. आम्हाला भाजपाचा पराभव कराचया आहे. आमची विचारधारा समान आहे. त्यांना गरज वाटली तर आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.