राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “भाजपाच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचं विष वाढत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत, पंतप्रधानांकडे परदेशात जायला वेळ आहे, पश्चिम बंगालला जाण्यासाठी सवड आहे मात्र २० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही.” आज(रविवार) रांची येथील हरमू मैदानात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, “बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष  पसरवत आहे. शेतकरी १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. मात्र दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही.”