राजस्थान सरकारविरोधात भाजपा उद्या अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. शुक्रवारी राजस्थान सरकारविरोधात उद्या भाजपा अविश्वास प्रस्ताव आणणार आहे अशी घोषणा भाजपाने केली आहे. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरु होते आहे. या अधिवेशनातच हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे. विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात झालेलं सचिन पायलट यांचं बंड, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती. शमलेलं बंड आणि आता अविश्वास प्रस्ताव हे सगळं करुन भाजपा गेहलोत सरकारला अडचणीत आणण्याच्या तयारीत आहे.पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

अशोक गेहलोत सरकार लवकरच पडणार आहे असं भाजपानेही म्हटलं आहे. काँग्रेस पक्ष आपल्या घरातले भांडण मिटवू पाहते मात्र ते मिटवणं त्यांना शक्य नाही.त्यामुळे गेहलोत सरकार लवकरच कोसळणार आहे असंही गुलाबचंद कटारिया यांनी म्हटलं आहे. आपल्याच अंतर्विरोधामुळे हे सरकार पडणार आहे. मात्र काहीही कारण नसताना काँग्रेस आपल्या अपयशाचं खापर काँग्रेस भाजपावर फोडते आहे. असंही गुलाबचंद कटारिया यांनी म्हटलं आहे.

भाजपाच्या आमदारांची बैठक गुरुवारी जयपूरमध्ये पार पडली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही सहभागी झाल्या होत्या. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी आदेश दिल्यानंतर १४ ऑगस्ट अर्थात शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनात करोनाचे संकट, लॉकडाउन आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. तसंच राजस्थान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यचाही निर्णय घेतला आहे.

गेल्या महिन्यात सचिन पायलट यांनी राजस्थानच्या गेहलोत सरकारविरोधात दंड थोपटले आणि पक्षाला रामराम केला होता. मात्र त्यांचं बंड शमलं ते काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्येही परतले. सचिन पायलट यांनी जे बंड केलं त्यासाठीही भाजपावरच आरोप करण्यात आले होते. मात्र आता त्यांचं बंड शमलं आहे. दरम्यान शुक्रवारी भाजपा गेहलोत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. त्यामुळे गेहलोत सरकारच्या अडचणी वाढणार यात शंका नाही.